मुंबई । लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कृष्णकुंज या निवासस्थानी मनसे नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीस मनसे नेते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीपर्यंत राज ठाकरे आमच्यासोबत राहतील असे वाटत नाही, असे सांगत मनसेला महाआघाडीमध्ये स्थान नसल्याचे स्पष्ट केले होते. याच पार्श्वभूमीवर पर्यायांचा विचार करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याचे वृत्त आहे.
राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जवळीक वाढते आहे का? असे वाटत असतानाच शरद पवार यांनी मात्र निवडणुकीपर्यंत राज ठाकरे आमच्यासोबत राहतील असे वाटत नाही, असे म्हटले. खुद्द शरद पवार यांनीच महाआघाडीत मनसेला स्थान नसल्याचे सांगितल्याने मनसे आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर पडदा पडला आहे. राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. आगामी निवडणुकीत मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होणार नाही, असा दावाच अहिर यांनी केला आहे. त्यामुळेच मुंबईतली कोणतीही जागा मनसेसाठी सोडण्याचा प्रश्नच येत नाही, असेही अहिर यांनी स्पष्ट केले होते.